जयपूर: राणी पद्मावतीवर आधारित संजय लिला भन्साळीच्या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा निषेध करीत आज चित्तौडगड किल्ल्याची दारे बंद करण्यात आली. हा किल्ला पाहण्याठी आलेल्या पर्यटकांना परत जाण्याची विनंती केली जात आहे. सकाळी दहा ते सहा या काळात या किल्ल्यात प्रवेश बंद करण्यात आला आहे. आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करुन धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन शांततामय मार्गाने केले जात असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किल्ल्यात कुणालाही जाऊ दिले जाणार नाही असे सर्व समाज निषेध समितीच्या वतीने सांगण्यात आले. सध्या पर्यटनाचे दिवस असल्याने दररोज तीन ते चार हजार पर्यटक किल्ल्याला भेट देण्यासाठी येतात. या आंदोलनमुळे सर्वांना माघारी फिरावे लागत आहे. आम्ही आता आंदोलन सुरु केले आहे. दिवसभर आंदोलनकर्त्यांच्या संख्येत वाढ होत जाईल. हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये अशी मागणी आंदोलक करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या किल्ल्याची दारे आज बंद राहिली. आंदोलनस्थळी आणि किल्ल्याच्या बाहेर प्रमुख भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Comments