अहमदनगर: कोपर्डीत त्या बालिकेने त्या क्षणी काय भोगले अन सोसले असेल याचा विचार केला तर आजही मन सुन्न होते. या प्रकरणातील दोषींना मानवतेच्या दृष्टीकोनातून फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्या अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी आज युक्तीवादावेळी केली. तिघांपैकी दोन आरोपी आपण निर्दोष असल्याचा दावा करतात. परिस्थितीजन्य पुराव्यांनी या तिघांवरील आरोप सिद्ध केले आहेत. उद्या दुपारी या प्रकरणी शिक्षा सुनावली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोपर्डी आणि न्यायालयाच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोपर्डी घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या तिघांवर कट रचून बलात्कार करणे व नंतर हत्या करणे असा आरोप आहे, गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप मिळते की फाशी सुनावली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. फाशी मागायची की जन्मठेप याबाबतचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून अभ्यासाअंती करणार आहोत असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले. दोषींना फाशीच द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
Comments