HOME   लातूर न्यूज

अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चेहरा

भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र अडचणीत, जनता नाखूष- आमदार अमित देशमुख


अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चेहरा

लातूर: भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे संपूर्ण महाराष्ट्राच अडचणीत आला आहे, राज्यातील एकही घटक आता या सरकारवर खूष नाही, जनतेची ही नाराजी मतपेटीपर्यंत नेण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडुन सत्ता परिवर्तन घडवून आणावे, असे आवाहन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर येथे आयोजित काँग्रेस पक्षाच्या व्हीजन २०१९ या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात बोलताना केले. अत्यंत आक्रमक आणि तेवढयाच खुमासदार शैलीत आमदार अमित देशमुख यांनी या शिबिरात आपले विचार मांडले, त्यांच्या या भाषण शैलीकडे पाहून, प्रदेश काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि शिबिरामधील कार्यकर्त्यांना लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण झाली. सर्वांनी तशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.
आमदार अमित देशमुख यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राची आजची गरज ओळखूनच प्रदेश काँग्रसने जिल्ह्या-जिल्ह्यात व्हीजन २०१९ या नावाने कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी प्रारंभी बीज भाषण केले. त्यांचे हे भाषण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठीचे बीज असल्याचे समारोपाच्या कार्यक्रमात लक्षात आले आहे, त्यांनी या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जी ऊर्जा निर्माण केली आहे, ती २०१९ मध्ये विधानसभेवर तिरंगा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चेहरा आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्हा सर्व काँग्रेसजणांचे समर्थन आहे, असे सांगून ‘अशोकराव चव्हाण तुम आगे बढो, हम तुमारे साथ है’ अशी घोषणा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली, तेंव्हा कार्यकर्त्यांनीही या घोषणेची पुनरावृत्ती करत सभागृहात उत्साहवर्धक वातावरण तयार केले.


Comments

Top