HOME   व्हिडिओ न्यूज

इंद्रप्रस्थवरील सगळा खर्च लोकसहभागातून!

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख पुसायची आहे, पालकमंत्र्यांना विश्वास


लातूर: इंद्रप्रस्थ अभियानाला कसलाही निधी आलेला नाही. हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे असा खुलासा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने एकमेव लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून दोन वर्षांपूर्वी दुष्काळी जिल्हा म्हणून जागतिक पातळीवर लागलेला कलंक या माध्यमातून पुसला जाईल असा आशावाद पालकमंत्री संभाजी पाटील यांनी व्यक्त केला. येत्या ०३ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. अभियानातील जलयोद्ध्यांना ते मार्गदर्शन करणार असून या अभियानाचे फलित पाहता उद्या सरकारला इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राज्यात राबविण्यासाठी विचार करावा लागेल असा विश्वास पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम सांगितले. मुख्यमंत्री अहमदपूर येथे पुतळ्याचे अनावरण, वडार समाजाच्या मेळाव्याला उपस्थिती, जलयोध्द्यांना मार्गदर्शन करणार आहेत. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाला निधी आला आहे का किंवा आक्का फाऊंडेशन यावर स्वत: खर्च करणार आहे असा प्रश्न विचारला असता हा सबंध उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे, यात कुठूनही कसलाही पैसा आलेला नाही हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.


Comments

Top